महापरिनिर्वाण दिन | दिनमुद्रा | भाग : 41 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर

महापरिनिर्वाण दिन | दिनमुद्रा | भाग : 41 | डॉ. बाबासाहेब आंबेडकर

6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' किंवा 'महापरिनिर्वाण दिवस' म्हटलं जातं. महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादरस्थित चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. या दिवशी देशभरातील लोक, विशेषतः डॉ. आंबेडकरांचे अनुयायी विविध कार्यक्रम आणि समारंभात सहभागी होतात. यामध्ये त्यांच्या पुतळ्यांना आणि स्मारकांना पुष्पांजली अर्पण करणे, त्यांचे जीवन आणि कार्य यावर व्याख्याने आणि चर्चा आयोजित करणे आणि त्यांनी सांगितलेल्या तत्त्वांवर प्रकाश टाकणारे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करणे यांचा त्यात समावेश असतो. बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे, याचाच अर्थ ‘मोक्ष’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळं त्यांच्या पुण्यतिथीसाठी ‘महापरिनिर्वाण’ हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. जिथे तो अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा ज्ञानी व्यक्तीच्या मुक्तीच्या संदर्भाने वापरला जातो. हा शब्द एखाद्या आत्मज्ञानी व्यक्तीच्या अंतिम आणि पूर्ण निर्वाण किंवा मुक्तीच्या अनुशंघाने येते. हा शब्द प्रामुख्याने बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांच्या मृत्यूशी संबंधित आहे. ज्यामध्ये त्यांच्या भौतिक अस्तित्वाचा अंत आहे. अगदीच सोप्या भाषेत सांगायचे तर, विवेक आणि विज्ञानवादाची कास धरणारा, निसर्ग आणि मानवता यांचा आदर करणारा, मानवी मुल्यांवर आयुष्यभर वाटचाल करणाऱ्या ज्ञानी व्यक्तीच्या निधनाचा क्षण किंवा दिवस म्हणजे महापरिनिर्वाण असे आपण मानू शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकोनॉमिक्समध्ये पी.एच.डी. मिळवली. असे करणारे ते पहिलेच भारतीय होते. मराठी, हिंदी, इंग्रजी, पारशी, गुजराती, पाली, संस्कृत, बंगाली, जर्मन, फ्रेंच इ. भाषा त्यांना अवगत होत्या. डॉ. आंबेडकर यांच्या 'The Problem of the Rupee – Its origin and its solution' पुस्तकाच्या आधारावर 'रिझर्व बँक ऑफ इंडिया'ची पायाभरणी झाली. तत्कालीन भारतीय समाजात अस्पृश्यांना दिली जाणारी हीन वागणूक डॉ. आंबेडकरांनी स्वतः अनुभवली होती. त्यामुळे त्यांच्या हक्कांसाठी ते आयुष्यभर झटले. 'शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा', असा संदेश त्यांनी जनतेला दिला. 14 ऑक्टोंबर 1956 रोजी नागपूर येथे 5,00,000 अनुयायांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथील राहत्या घरी झोपेत असताना या महामानवाचं महापरिनिर्वाण झालं. दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला. मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अरबी समुद्राला लागून असलेल्या बाबासाहेबांच्या समाधीला भेट देण्यासाठी भारतभरातून लाखो येतात. अत्यंत आदरानं चैत्यभूमीला भेट देतात. बाबासाहेबांची प्रतिमा व मुर्तीसमोर अभिवादन करतात. डॉ. आंबेडकरांचे विचार, त्यांनी सामाजिक उन्नतीसाठी केलेले कार्य आणि मानवी मुल्यांच्या जपणुकीसाठी नोंदवलेला सक्रीय सहभाग आदींची प्रेरणा म्हणून हा दिवस ओळखला जातो. लोककल्याणाचे कार्य, लोकांची सामाजिक समज वाढविणे आणि त्याचे महत्त्व या उद्देशाने अनेक नागरिक डॉ. आंबेडकरांचे स्मरण करतात तसेच आंबेडकरी अनुयायांसाठी हा दिवस अतिशय दु:खाचा आणि तितकाच आंबेडकरी विचारांनी भारलेला असतो. बाबासाहेब आंबेडकर हे एक प्रमुख भारतीय न्यायशास्त्रज्ञ, समाजसुधारक आणि राजकीय नेते होते. ज्यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. प्रचंड कष्ट, विद्वत्ता आणि संघर्षाच्या जोरावर त्यांनी केवळ स्वत: चाच नव्हे तर समाज आणि भारतातील अवघ्या मानव जातीचा उद्धार केला. अशा या महामानवास विनम्र अभिवादन..!!